meaning of manache shlok in marathi
meaning of manache shlok in marathi । मनाचे श्लोक अर्थ सहित
meaning of manache shlok in marathi | Manache Shlok Lyrics
सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी ।
सदा सर्वदा सत्य वादी विवेकी ।
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ।।
शब्दांचे अर्थ : आर्जवी – नम्रपणाने (गरीबीने), प्रिय – आवडतो, सर्वलोकी – सर्व लोकांना, सत्यवादी नेहमी खरेपणाने वागणारा, विवेक विचार. कदा कधीही, मिथ्य – खोटे.
अर्थ : जो सर्वांशी नेहमी नम्रपणानं वागतो. गोड बोलतो, तो खरेपणाने वागतो, जो कधीच खोटे बोलत नाही असाच भक्त मोठेपणी खरा मोठेपणा मिळवील. त्याला खरे समाधान वाटेल, असेच रामदास सर्वांना सांगत असत. असा भक्त रामरायांनाही प्रिय वाटेल!
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।
जनी निंद्य ते सर्व सोडूनि यावे ।
जनी वंद्य ते सर्वभावे करावे ।।
शब्दांचे अर्थ : सज्जन – चांगले लोक, भक्तिपंथ – भक्ती करण्याची पद्धत (रीत), श्रीहरी – देव, पाविजेतो – प्रसन्न होतो, स्वभावे – सहज, निंय वाईट. जनी – लोकात, वंद्य – चांगले, सर्वभावे – मनापासून,
अर्थ : समर्थ सांगतात, हे मानवा, चांगले लोक (उत्तम वागणुकीचे ) ज्या रीतीने वागत गेले, तसाच तूही जा, म्हणजे देव तुझ्यावर कृपा करील. जगात ज्या ज्या वाईट गोष्टी असतील, त्या सर्व तू सोडून दे. ज्या चांगल्या गोष्टी असतील, त्याच मनापासून नेहमी करीत जा. तुझा सर्व काळ सुखात जाईल.
मना वासना दुष्ट कामा नये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।
मना सर्वथा नीति सोडू नको हो ।
मना अंतरी सार विचार राहो ।।
शब्दांचे अर्थ : वासना – इच्छा, दुष्ट – वाईट, कामा नये – हिताची नाही, सर्वथा – सतत (नेहमी), नीति चांगले नियम, अंतरी मनात, सारविचार चांगल्या गोष्टींचा विचार.
अर्थ : आपल्या मनात कधीही वाईट विचार नसावा. दुष्टवृत्तीही नसावी. पापबुद्धीही नसावी. नेहमी नीतीने म्हणजेच चांगले नियम लक्षात ठेवून वागावे. (ही शिकवण घरी मिळतेच). चांगले कोणते? वाईट कोणते? याचा आपल्या मनाशी नीट विचार करावा. नेहमी चांगल्या गोष्टींचेच अनुकरण करावे.
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्य संकल्प जीवी धरावा ।
मना कल्पना ते नको वीषयाची ।
विकारे घडे हो जनी सर्व छी-छी ।।
शब्दांचे अर्थ: संकल्प नेम (नियम). कल्पना – विचार, विषय दोष. घडे – घडते, छी-छी – फजिती.
अर्थ : मनात वाईट विचार कधीच येऊ देऊ नयेत. तसाच वागण्याचा नेम धरा. जे-जे चांगले असेल तेच मनात साठवून ठेवा व तसे वागा. मनात वाईट विचारांचा कधीच विचार आणू नका. जर तुमची वागणूक वाईट विचारांची-कृतीची दिसली, तर लोक तुमची छी-थू करतील. फजिती करतील. त्यामुळे तुम्हालाच नव्हे तर तुमच्या सर्व घरालाच तो कमीपणा वाटेल, हे लक्षात ठेवा.
मना राम कल्पतरू कामधेनू ।
निधीसार चिंतामणी काय वानू ।
जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता ।
तया साम्यता कायशी कोण आता ॥
शब्दांचे अर्थ : कल्पतरू – तुम्हाला हवी असेल ती वस्तू त्वरित देणारा एक वृक्ष, कामधेनू – तुम्हाला हवी असेल ती वस्तू त्वरित देणारी गाय, चिंतामणी – काळजी दूर करणारा, साम्यता – सारखेपणा.
अर्थ : समर्थ सांगतात, प्रभू रामचंद्र हे कल्पवृक्षासारखे किंवा कामधेनूसारखे, तुम्ही मागाल ते देतील. (ते फार मोठे अधिकारी आहेत.) रामाच्या सेवेत मन रमवा. त्यामुळे तुमची सर्व चिंता (काळजी) दूर होईल. प्रभू राम हे देवाचेच अवतार आहेत. त्यांच्या प्रेरणेने सर्व उत्तमच होत जाईल. त्यांच्या मोठेपणाशी कशाचीच तुलना करता येणार नाही, हे लक्षात ठेवा.
घनश्याम हा राम लावण्यरूपी ।
महा थोर गंभीर पुण्य प्रतापी ।
करी संकटी सेवकाचा कुडावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।
शब्दांचे अर्थ : घनश्याम श्यामल वर्णाचा, लावण्यरूप – सुंदर, प्रतापी – पराक्रमी, कुडावा रक्षण. चिंतणे स्मरण करणे, आठवणे.
अर्थ : श्यामवर्णाचे प्रभु रामचंद्र दिसण्यात सुंदर आहेत. पराक्रमी आहेत. शांत आहेत. धीट आहेत. ते आपल्या सेवकांचे रक्षण करतील. अशा रामरायांचे नित्यनेमाने सकाळच्या वेळी स्मरण करावे. त्यांना मनोभावे नमस्कार करावा.
सुखानंदकारी निवारी भयाते ।
जनी भक्तिभावे भजावे तयाते ।
विवेके त्यजावा अनाचार हेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।
शब्दांचे अर्थ : सुखानंद सुख व आनंद देणारा, निवारी – नाहीसे करतो, भजावे भक्ती करावी, विवेके – विचारपूर्वक. त्यजावा – टाकावा, अनाचार – वाईट वागणूक, हेवा – मत्सर, द्वेष.
अर्थ : जो आपल्या मनातील भय घालवतो व मन आनंदी ठेवतो, त्या रामप्रभूना नेहमीच भक्तिभावाने आठवीत जावे. स्वतः विचार करून बाईट गोष्टी, द्वेष करणे सोडून द्यावे. नेहमी रामनामाच्या स्मरणाने तुम्हाला सद्दुद्धी मिळेल. म्हणून रोज सकाळी रामप्रभूची भक्ती करा.
जयाचेनि नामे महादोष जाती ।
जयाचेनि नामे गती पाविजेती ।
जयाचेनि नामे घडे पुण्यसेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।
शब्दांचे अर्थ : दोष – दुर्गुण, गती – चांगले गुण, पुण्यठेवा – पुण्याचा साठा (पुण्य वाढते).
अर्थ : प्रभू रामरायांचे नाव सतत घेत जाईल, त्याचे दोष दूर होतील. त्याला चांगली बुद्धी मिळेल. नामस्मरणाने पदरी पुण्य पडेल. भाग्यवान व्हाल. यासाठी सकाळी रामरायाचे नाव सतत घेत जावे.
मुखी नाम विश्राम तेथेचि आहे ।
सदानंद आनंद शोधोनि पाढे ।
तयावीण तो शीण संदेह कारी ।
निजधाम हे नाम शोकोपहारी ।।
शब्दांचे अर्थ : मुखी – तोंडाने, विश्राम शांतता. सदानंद – नेहमी मिळणारा आनंद, संदेह संशय. शोक – अस्वस्थता, निजधाम आपलं घर.
अर्थ : जो नेहमी राम-नाम म्हणत असेल त्याच्या मनाला शांतता मिळेल, याबद्दल मनात कुठलाही संशय (शंका) ठेवू नये. रामनामाच्या कृपेने सर्व दुःखे नाहीशी होतील. मनाची अस्वस्थता पूर्ण जाईल. सर्व घर आनंदी राहील.